Friday 14 October 2016



‘भेट महाराष्ट्र 2017’
उपक्रम साजरा करणार
                                     - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद दि. 14-  पुढील वर्ष हे ‘भेट महाराष्ट्र 2017’ या उपक्रमाने पर्यटकांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
वेरुळ-अजिंठा महोत्सव आंतरराष्ट्रीय 2016 च्या उद्घाटन प्रसंगी वेरुळ येथे कैलास लेण्याच्या पायथ्याशी आयोजित उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्य मंत्री मदन येरावार, श्रीमती अमृता फडणवीस, राज्य महिला आयोग अध्यक्षा सौ. विजया राहटकर, वक्फ बोर्ड अध्यक्ष एम.एम. शेख, आ. सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, श्रीमती सुभद्रादेवी रावल, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.एच. गोविंदराज, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन संचालक सतीश सोनी, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी, म.न.पा आयुक्त ओमप्रकाश बोकरीया, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            निर्सगदत्त  प्रफुलीत पोर्णिमा पुर्व चंद्र प्रकाशात हा महोत्सव आयोजित झाला. अशा या आल्हादायक प्रसंगी पर्यटनाला चालना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबाद येथील विमानतळाच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वेरुळ पर्यटन  आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन विकासाचे काम सोईसकर व्हावे, व पर्यटकांच्या सुविधेत वाढ व्हावी म्हणून औरंगाबाद येथे पर्यटन संचालनालयाचे कार्यालय स्थापन करण्यात येईल व तेथे सहायक संचालक दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल.
            राज्याची ओळख ही तेथील कला व संस्कृती किती समृध्द आहे यांच्यावरुन होत असते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील वेरुळ-अजिंठा लेण्या जागतिक स्थळावर किती प्रसिध्द आहे. हे सांगत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगोलियातील डयुन हाँग या शहराच्या लेण्या संबंधीचे उदाहरण दिले.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी डयुन हाँग येथे भेट दिली. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले की, हजार वर्षापुर्वी मंगोलियाचे पर्यटक अजिंठा येथे येवून लेण्याची माहिती घेऊन गेले व त्यांनी तेथे हबेहुब लेण्या साकारल्या त्या अजिंठ्या सारख्या ओरिजनल वाटतात पण तेथील लोक अजिंठाचा उल्लेख करतात. एवढा जागतिक वारसा आपल्या अजिंठा- वेरुळला लाभला आहे.
            प्रारंभी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रास्ताविकात  वेरुळ-अजिंठा महोत्साच्या आयोजनाच्या संबंधात माहिती दिली. या महोत्सव दरवर्षा आयोजित केला जाईल असे सांगितले.
            कॉफी टेबल बुक चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर एक्सप्लोअर एलोरा या पुस्तकाचे प्रकाशन श्री. हरीभाऊ बागडे व श्री. जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. अमेंझिंग आर्टीस्टस् या पुस्ताकांचे प्रकाशन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र अनलिमीडेट या मासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.
            प्रारंभी मुख्यमंत्री यांनी दीप प्रज्वलन करुन या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन केले. पंडीत उध्दवराव शिंदे आपेगावकर यांच्या जुगलबंदीचा आस्वादही मुख्यमंत्रीसह सर्वांनी घेतला.







बौद्ध धर्मामुळे जगात भारताची ओळख
                                     - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद दि. 14- जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मामुळे भारताची जगात ओळख आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. केंद्र आणि राज्य सरकार राज्यात बौद्ध धर्माशी निगडीत विविध  स्थळांचा विकास करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे धम्मयान एज्यकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीवल फॉर सोशल ॲण्ड कल्चरल रिलेशनशिप 2016 या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिकन्याय मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, श्रीलंकेतील माजी मुख्यमंत्री शशिन्द्र राजपक्ष, श्रीलंकेतील खासदार उदय गमनपिल, कोरीयाचे महावाणिज्यदुत  किम सुंगयून, महापौर त्र्यंबक तुपे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, तसेच मान्यवर भिक्खु व्यासपीठावर उपस्थित होते.
तथागत गौतम बुध्दांनी अहिंसक तत्वाने त्यागाची शिकवण देऊन जग जिंकले आहे. बुध्दाच्या तत्वज्ञानात जगाचे कल्याण करण्याची क्षमता सामावलेली आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगातल्या जपान सारख्या अनेक प्रगत देशामध्ये बौध्द धर्माचा सर्वाधिक प्रभाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा केलेल्या भाषणात नमुद केल्याप्रमाणे भारत युध्दाचा नव्हे तर बुध्दाचा देश असून या बौध्द धर्माचे उगमस्थान असलेल्या भारताची संपुर्ण वाटचाल त्या मैत्री तत्वातून झाली पाहिजे. आपल्या राज्याला बौद्ध धर्माची वैभवशाली वारसा स्थळे अंजिठा-वेरुळच्या रुपात  लाभलेली असून या पार्श्वभूमीवर देश विदेशातील बौद्ध धर्माचे अभ्यासक, उपासक यांच्यासाठी अद्यावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बुध्दीस्ट सेंटर’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.  ‘बुध्दीस्ट सर्कीट’ विकसीत करण्यासाठी केंद्र सरकार कडून 100 कोटीचे अर्थ सहाय्य मिळणार असून राज्य शासनही त्यासाठी आर्थिक योगदान देणार आहे.
बौध्द तत्वज्ञान ज्या  पालीभाषेत उपलबध्‍ आहे, त्या पाली भाषेच्या व्यापक संवर्धनासाठी देखील राज्य शासन कटीबध्द असून या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर स्वातंत्र्य, समता, बधुंता ही उदात्त मुल्य  देणाऱ्या बौध्द धर्माचा स्विकार  केला. या त्रिसुत्रीवर आधारित सौहार्दपुर्ण समताधिष्ठीत समाजाची निर्मिती करण्याच्या ज्या व्यापक उद्देशातून बाबासाहेबांनी हा धर्म स्विकारला त्याचे आचरण  करण्याची आज खरी आवश्यकता आहे. पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा  उंचावण्याची महत्वाची जबाबदारी आपल्या सगळयांवर असून घटनेने आपल्याला समता, बंधुभावाचा,समन्वयाचा  जो संदेश दिलेला आहे, त्याचा सन्मान ठेऊन समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आपल्या सर्वाना समन्वयपुर्वक वाटचाल करावयाची आहे.  अशी वाटचाल केल्यानेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष आचरणात येतील, त्याची आज समाजाला जास्त गरज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या वेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजकारण, समाजकारण, संशोधन, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यात गंगाधर गाडे, कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे, अभिनेता गगन मलिक, अभिनेत्री आंचल सिंग, अभिनेत्री अंशु मलिक, कला दिग्दर्शक संतोष शंखद, स्वदेशी विमान निर्मिती तंत्रज्ञान देणारे कॅप्टन अमोल यादव, अशोक आठवले, अविनाश कांबळे यांचा समावेश होता.
 यावेळी  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकार मधील सेवांबाबत नवबौध्दांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगितले तर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महोत्सावाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद देवून या उपक्रमाला सर्व ते सहकार्य केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिक्खू धम्मज्योती थेरो यांनी  केले. आ. संजय शिरसाट यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमाला श्रीलंका, कोरीया, जपान, अमेरिका, कंबोडीया येथील प्रतिनिधीसह मोठी उपस्थिती होती.