Thursday 2 March 2017



औरंगाबाद येथे पोलीसांसाठी
 सुसज्ज टाऊनशिप  उभारणार
                                                       -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
            औरंगाबाद,दि. 2 : मुंबई, पुणे आणि नागपूर शहराच्या धरतीवर औरंगाबाद शहरात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोई, सुविधांनीयुक्त अशी स्मार्ट टाऊनशिप आगामी काळात उभारण्यात  येईल.  या टाऊनशिप मध्ये व्यायमशाळा व कौशल्या विकास केंद्राचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            येथील पोलीस आयुक्तालयाच्या  देवगिरी मैदानावर आयोजित पोलीस आयुक्तलायाची प्रशासकीय इमारत व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचे भूमिपूजन, कोनशिला अनावरणने झाले. तसेच 200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाला,  त्यावेळी ते बोलत  होते.
            यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, गृह राज्यमंत्री (शहरे) रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, महापौर भगवान घडामोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई राहटकर, राज्य वक्फ बोर्डेचे अध्यक्ष एम.एम. शेख, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तीयाज जलील, प्रशांत बंब,  राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस महासंचालक ( गृहनिर्माण) व्ही.डी. मिश्रा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अजीत पाटील, विभागीय आयुक्त पुरुषत्तोम भापकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे आदी मान्यवर  उपस्थित होते.
            पोलीस दलातील कर्मचारी शिवकालीन जुन्या घरांमध्ये राहत आहेत. ही खंत मनात असल्यामुळे  त्याच्यासाठी  नवीन घराच्या बांधकामासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.  ही एक चांगल्या प्रकारची सुरुवात असून  पोलीसांच्या परिवाराला उत्तम व्यवस्थेत राहता आले पाहिजे यासाठी औरंगाबाद शहरामध्ये नवीन 532 इमारतींच्या माध्यमातून पोलीसांसाठी परिपूर्ण वसाहत  उभारण्यात येत आहे. राज्यात पोलीस दलासाठी  आठ ते दहा हजार कोटींच्या  विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून पोलीस दलाच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे. पोलीसांच्या सर्वांगिण विकासासाठी  सर्वोतोपरी सहकार्य करण्यात  येईल.अशी  ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात पोलसांसाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्यासाठी 51 हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात पोलीसांच्या घरांसाठी राज्य शासनाने उत्तम काम केले. ऐवढेच नव्हे तर गेल्या पंधरा वर्षापेक्षा दुप्पटीने काम केले आहे. पोलीसांना पुर्वी खुराड्यासारखी घरे देवून समाधान व्यक्त केले जात असे परंतु आता आम्ही जी घरे मुंबईत पोलीसांसाठी बांधली त्या घराची मागणी पोलीस अधिकारीही करु लागले आहेत. ऐवढे या घरांचे कामा उत्तम झाले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे पोलीसांसाठी आठ हजार घरांची स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात येतेय. अशी टाऊनशिप पुणे, नागपूर आणि आता औरंगाबादमध्ये करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पोलीस वसाहतीच्या विकासासाठी पीपीटीचा प्रयोग करता येईल का यांचा विचार करावा. या टाऊनशिप मध्ये तसेच प्रत्येक पोलीस वसाहतीत एक सुसज्ज व्यायाम शाळा आणि कौशल्य विकास केंद्रांची सुविधा करण्यात येईल.त्यामुळे पोलीस आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच त्यांचा बायका –मुलांन कौशल्याचे शिक्षण देऊन स्वता:च्या पायावर उभे करता येईल, असेही ते म्हणाले.
            औरंगाबाद शहराला आपण स्मार्ट शहर करतोय, त्यामुळे शहरातील पोलीसही स्मार्ट झाले पाहिजे. शहरात माहिती व तंत्रज्ञानाच्या सुविधा येत आहे. आयटी पार्कचा विस्तार होणार आहे. त्यामुळे शहरात सी.सी. टी.व्ही द्वारे सर्व्हिलन्स झाले पाहिजे, त्यादृष्टीने काम करुन  त्याचा नियत्रंण कक्ष पोलीस आयुक्तालयात करण्यात यावा, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेतही राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत  अग्रेसर झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आहेत. अशा पोलीसांना क्रीडा विषयक सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी पोलीस महासंचालक श्री. माथूर यांनी केली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
            पोलीसांना निवृत्ती नंतर वाढत्या किमंतीमुळे आरोग्याच्या सेवा परवडत नाहीत. त्यामुळे एएसआयच्या धरतीवर पोलीसांना महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शहरात आयुष्यभर काम केल्यानंतर पोलीसांचे कुटुंब खेड्यात जाण्यास तयार होत नाही, त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांना  शहरात घर मिळावे यासाठी योजना आखण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातील पोलीसांसाठीही अशा योजनेचा प्रस्ताव तयार करावा, त्यासाठी आवश्यक असेल तर सरकारी किंवा खाजगी जमीन देवून पोलीसांच्या निवृत्तीनंतरच्या घराचे स्वप्न साकार करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
            विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मागणीचा धागा पकडून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी किताब तीन वेळा पटकावलेल्या पैलवान विजय चौधरी यांना शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने घेतला आहे. तांत्रिक पुर्तता करण्याचे काम चालू आहे. कारण त्यांना वर्ग एकचे पद द्यावयाचे आहे. असे सांगून  ते म्हणाले की, राज्यातील इतरही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा  योग्य सन्मान करण्यात येत आहे. त्यांनाही उपलब्धतेप्रमाणे नौकऱ्या देण्यात येत आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.
            विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, पोलीस दलाच्या कामगिरीला प्रोत्साहान देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीस दलाचे अनेक प्रश्न सोडविले आहे. शहरातील क्रांन्ती चौक पोलीस चौकीसाठी सुध्दा नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. ते काम सुध्दा पुढील काळात करण्यात येईल. तसेच शहरातील विविध विभागाची कार्यालये खासगी जागेत आहे. ती कार्यालये सरकारी जागेत स्थालांतरीत  करण्यासाठी शहरात प्रशासकीय इमारतअसली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस महासंचालक (गृह निर्माण) यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमांच्या सुरुवातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले तर  सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी आभार व्यक्त केले





Wednesday 25 January 2017



भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या
 हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

औरंगाबाद, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 व्या  वर्धापन दिनानिमित्त आज पोलिस आयुक्तालय येथील देवगिरी मैदानावर  आयोजित मुख्य  शासकीय समारंभात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी महपौर बापू घडामोडे, खा. चंदकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. इम्तीयाज जलील, स्वातंत्र सैनिक, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, महानगर पलिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया,अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे,विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.
            शुभेच्छा संदेशात डॉ.भापकर म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देण देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्व क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य ओळखले जाते. स्वच्छात अभियानेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदऊन परिसर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्प करु या तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, समाजातील अज्ञान दुर करण्यासाठी  वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती  घेऊन तो यशस्वी करूण्याचा संकल्प करा असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.
  देशाला स्वातंत्र मिळून देण्याऱ्या थोर व्यक्तींचे स्मरण केले पाहिजे, धर्म,जात, पंथ,क्षेत्र हा भेदभाव ना करता सर्वांनी  हातात हात घालून यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, शिल्पकला,नैसर्गिक साधन संपत्ती, आणि औद्यागिक या सगळ्यासह वैचांरिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच उज्वल वाटचाल होत रहावी. यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंध भावनेतून कृतीशील होऊ, या अशी भावना डॉ.भापकर यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातील विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी परेडचे निरीक्षण करून मानवदंना स्वीकारली. त्यानंतर  जलयुक्त शिवार अभियानामध्ये  2015-16,2016-17 मध्ये उत्कृष्ट नियोजन करून अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल तसेच स्वच्छ भारत आभियानामध्ये उत्कृष्ठ कार्यबद्दल डॉ.भापकर  यांचे हस्ते जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय यांचा सन्मान व सत्कार  करण्यात आला.
पोलीस खात्यात निष्ठेने सेवा करणऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक फसीयोद्दीन खान यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर ज्ञानदीप विद्यालय व रावसाहेब म्हस्के कनिष्ठ महाविद्यालयाच्या लेझीम  पथकांने सांस्कृतिक कार्यक्रमांचे  तर एमआयाटी विद्यालयाचे विद्यार्थांनी  दौरी मल्लखंम व  मल्लखंम  या मैदाणी खेळाचे सादरीकरण केले. सामूहिक परेडचे संचालनामध्ये पोलिस, गृह रक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, आरएसपी स्कॅाऊट गाडी सैनिकी शाळयाच्या विद्यार्थीं, पोलिस बॅड,श्वान पथक , रस्त सुरक्षा, अग्निशामन, आरोग्य, वने, सामाजिक वनीकरण आदीविभागांचे चित्ररथ व वाहन पथक सहभागी झाले होते. 




Thursday 12 January 2017



महाराष्ट्र पोलीस नक्षलवाद, दहशतवादाचा
सामना करीत खेळातही अग्रेसर
-         राज्यपाल चे. विद्यासागर राव
          औरंगाबाद,दि.12 (जिमाका)---- नक्षलवाद व दहशतवादाशी सामना करत राज्यातील पोलीस खेळामध्येसुध्दा अग्रेसर असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळामध्ये यश प्राप्त करत आहेत.  ही बाब महाराष्ट्र पोलीस दलास व महाराष्ट्रास भूषणावह आहे. पोलीसांनी खेळामध्ये आणखी नैपुण्य प्राप्त करून राज्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.
            29 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण समारोप समारंभाप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे  अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते  तर व्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती अर्चना त्यागी यांची उपस्थिती होती. सभारंभास विभागीय महसूल आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी इत्यादी पोलीस व महसूल अधिकारी उपस्थित होते.
            महाराष्ट्र राज्य हे देशातील एक शिस्तप्रिय राज्य असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिकरणाला मदत होत आहे असे सांगून चे. विद्यासागर  म्हणाले की  या स्पर्धेतून पोलीस व जनता यांच्यात सौजन्यपूर्ण वातावरण निर्मिती होत असते. तसे पाहिले तर पोलीसांचे काम फार अवघड असून वर्षभर चोवीस तास ते जनतेला सेवा देत असतात. अशा या पोलीसांच्या जीवनातील खेळ ही स्वागताहार्य अशी एक बाब आहे.  या स्पर्धेत 2500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात 671 पोलीस अधिकारी - कर्मचारी महिलांचाही समावेश होता. यावरून पोलीसातील महिलाही पुरूषांपेक्षा कमी नाहीत त्याही  आपले दैनंदिन काम सांभाळून खेळाला प्राधान्य देतात. आपले आरोग्य व पोलीसांतील आपले काम हे उत्तमपणे सांभाळतात, हे यावरून सिध्द होते. त्यामुळे पोलीसातील खेळाडू महिलांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरव उद्गारही राज्यपाल यांनी यावेळी काढले.
            राज्यातील पोलीसांच्या समोर नव्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेली सायबर गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचारामुळे पोलीसांवरील कामाचा ताण वाढला आहे. पोलीसांनी सायबर गुन्ह्यां संबंधातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून या गुन्हेगारीला आळा घालण्याचे तंत्र अवगत करावे त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीसांना जनतेने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केली.
           




अध्यक्षीय समारोप करतांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, पोलीसांनी स्वंयशिस्त बाळगून ती स्वंयशिस्त जनमानसात रूजविल्यास समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊन पोलीसांवरील वाढणारा ताण कमी होण्यास मदत होईल असे सांगून त्यांनी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेतून पोलीसांना तणाव मुक्त होण्यास मदत होऊन त्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते, असे सांगितले.  
            यावेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी या स्पर्धेमध्ये आठ नवीन विक्रम  नोंदवण्यात आल्याची माहिती देवून अशा स्पर्धेमुळे पोलीसांचे मनोबल वाढण्यास मदत होते, तसेच पोलीसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे सांगितले, तर विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती अर्चना त्यागी यांनी प्रास्ताविक भाषणात या स्पर्धेत तेरा संघ व जवळपास 2500 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला. या वर्षी या स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्यात आला होता अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
            या स्पर्धेत पुरूष सर्वसाधारण विजेतेपद मुंबई शहर पोलीस, व्दितीय राज्य राखीव पोलीस बल तर तृतीय विजेतेपद कोल्हापूर परिक्षेत्रास मिळाले तर महिला सर्वसाधारण विजेतेपद प्रथम  मुंबई शहर, व्दितीय कोल्हापूर परिक्षेत्र आणि तृतिय प्रशिक्षण संचालनालयास असे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच बेस्ट महिला खेळाडू अॅथलॅटिक म्हणून जयश्री बोरगे यांना स्कुटी तर बेस्ट पुरूष ॲथलॅटिक म्हणून बिपीन ढवळे यांना मोटार सायकल भेट देण्यात आली.