महाराष्ट्र पोलीस नक्षलवाद, दहशतवादाचा
सामना करीत खेळातही अग्रेसर
-
राज्यपाल चे. विद्यासागर राव
औरंगाबाद,दि.12 (जिमाका)---- नक्षलवाद व दहशतवादाशी
सामना करत राज्यातील पोलीस खेळामध्येसुध्दा अग्रेसर असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
खेळामध्ये यश प्राप्त करत आहेत. ही बाब महाराष्ट्र
पोलीस दलास व महाराष्ट्रास भूषणावह आहे. पोलीसांनी खेळामध्ये आणखी नैपुण्य प्राप्त
करून राज्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर
राव यांनी आज येथे व्यक्त केले.
29 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारोप समारंभाप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते तर व्यासपीठावर अप्पर मुख्य सचिव (गृह) सुधीरकुमार
श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक
श्रीमती अर्चना त्यागी यांची उपस्थिती होती. सभारंभास विभागीय महसूल आयुक्त डॉ. पुरूषोत्तम
भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक
(ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी इत्यादी पोलीस व महसूल अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य हे देशातील एक शिस्तप्रिय
राज्य असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे राज्यातील
औद्योगिकरणाला मदत होत आहे असे सांगून चे. विद्यासागर म्हणाले की
या स्पर्धेतून पोलीस व जनता यांच्यात सौजन्यपूर्ण वातावरण निर्मिती होत असते.
तसे पाहिले तर पोलीसांचे काम फार अवघड असून वर्षभर चोवीस तास ते जनतेला सेवा देत असतात.
अशा या पोलीसांच्या जीवनातील खेळ ही स्वागताहार्य अशी एक बाब आहे. या स्पर्धेत 2500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी- कर्मचारी
सहभागी झाले होते. त्यात 671 पोलीस अधिकारी - कर्मचारी महिलांचाही समावेश होता. यावरून
पोलीसातील महिलाही पुरूषांपेक्षा कमी नाहीत त्याही आपले दैनंदिन काम सांभाळून खेळाला प्राधान्य देतात.
आपले आरोग्य व पोलीसांतील आपले काम हे उत्तमपणे सांभाळतात, हे यावरून सिध्द होते. त्यामुळे
पोलीसातील खेळाडू महिलांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरव उद्गारही राज्यपाल
यांनी यावेळी काढले.
राज्यातील पोलीसांच्या समोर नव्या तंत्रज्ञानातून
निर्माण झालेली सायबर गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचारामुळे पोलीसांवरील कामाचा
ताण वाढला आहे. पोलीसांनी सायबर गुन्ह्यां संबंधातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून या
गुन्हेगारीला आळा घालण्याचे तंत्र अवगत करावे त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण
कमी करण्यासाठी पोलीसांना जनतेने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही राज्यपाल चे. विद्यासागर
राव यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय
समारोप करतांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, पोलीसांनी
स्वंयशिस्त बाळगून ती स्वंयशिस्त जनमानसात रूजविल्यास समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण
कमी होऊन पोलीसांवरील वाढणारा ताण कमी होण्यास मदत होईल असे सांगून त्यांनी अशा प्रकारच्या
क्रीडा स्पर्धेतून पोलीसांना तणाव मुक्त होण्यास मदत होऊन त्यांना अधिक चांगले काम
करण्याची प्रेरणा मिळत असते, असे सांगितले.
यावेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी
या स्पर्धेमध्ये आठ नवीन विक्रम नोंदवण्यात
आल्याची माहिती देवून अशा स्पर्धेमुळे पोलीसांचे मनोबल वाढण्यास मदत होते, तसेच पोलीसांचे
आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे सांगितले, तर विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती
अर्चना त्यागी यांनी प्रास्ताविक भाषणात या स्पर्धेत तेरा संघ व जवळपास 2500 पोलीस
अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला. या वर्षी या स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्यात
आला होता अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण
करण्यात आले.
या स्पर्धेत पुरूष सर्वसाधारण विजेतेपद
मुंबई शहर पोलीस, व्दितीय राज्य राखीव पोलीस बल तर तृतीय विजेतेपद कोल्हापूर परिक्षेत्रास
मिळाले तर महिला सर्वसाधारण विजेतेपद प्रथम मुंबई शहर, व्दितीय कोल्हापूर परिक्षेत्र आणि तृतिय
प्रशिक्षण संचालनालयास असे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच बेस्ट महिला खेळाडू अॅथलॅटिक
म्हणून जयश्री बोरगे यांना स्कुटी तर बेस्ट पुरूष ॲथलॅटिक म्हणून बिपीन ढवळे यांना
मोटार सायकल भेट देण्यात आली.