राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने
- सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 12 : राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
स्व. उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानांचे काम प्रगतीपथावर असले तरी ही सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. उद्यानाच्या माध्यमातून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने, प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत.
वन उद्याने
माजीवाडा, कानविंदे(ठाणे), कार्लेखिंड, चौल(रायगड), तेन, पापडखिंड (पालघर), खाणू, चिखली (रत्नागिरी), रानभाबूली, मुळदे (सिंधुदूर्ग), नऱ्हे, रामलिंग (पुणे), गुरेघर, पारगाव (सातारा), बोलवाड, खामबेले (सांगली) कुंभारी, मळोली (सोलापूर), कागल, पेठ वडगाव (कोल्हापूर), पठारी (औरंगाबाद), माणकेश्वर, गंगाखेड (परभणी), बोंदर, वदेपुरी (नांदेड), तीर्थ, ढोकी (उस्मानाबाद), जालना ट्रेनिंग सेंटर, दहीपुरी(जालना), एसआरपीएफ, पोतरा (हिंगोली), नारायणगड, सेलुम्बा (बीड), तांबरवाडी, नागझरी (लातूर), कुडवा, नवाटोला, मोरगाव, गराडा(गोंदिया), वर्धा एमआयडीसी, रांजणी (वर्धा), वेण्णा (नागपूर), डोंगराला (भंडारा), चंद्रपूर, गोंदेडा, गोंडपिंपरी (चंद्रपूर), धानोरा (गडचिरोली), पारेगाव, माणिकपुंज, कांदाने (नाशिक), जामखेळ (धुळे), कुंभारखोरी, बिलाखेड(जळगाव), नांदुरखी, आठवाड (अहमदनगर), कोथाडा, होल (नंदूरबार), उपटखेडा, मदलाबाद (अमरावती), वाशिम्बा, कुरुम, कटीबटी(अकोला), पिंपळखुटा, जानुना(बुलढाणा), आंबेवन, जोंधळणी (यवतमाळ), तपोवन, रामनगर(वाशिम) या जैवविविधता वन उद्यानाचा यात समावेश आहे.
शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत : विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.
०००००
महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल
मुंबई, दि. १3 :- राज्य शासनाने महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे.
या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटातील १ लाख १४ हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले.
बचत गटाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याने २०१४ नंतर ३ लाख ९७ हजार १३७ बचतगटांची निर्मिती झाली. यातील लाभार्थी कुटुंबांची संख्या ३२ लाख ८६ हजार १४६ इतकी आहे. याच कालावधीत २६ हजार ४६५ समूह गट आणि ६८८८ ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
0000
गाळमुक्त धरणाची प्रभावी अंमलबजावणी
९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ निघाला
मुंबई, दि १3 :- गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात ९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे ५२७० धरणे स्वच्छ झाली आहेत.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. २०१४ पासून या योजनेला गती देण्यात आली.
धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे १.२५ लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
00000