डिजीटायझेशन संकल्पनेमुळे पोलीस विभाग
अधिक सक्षम व गतिमान होईल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) –डिजीटायझेशन संकल्पनेमुळे राज्यातील
पोलीस विभाग अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होत आहे. डिजीटल संकल्पनेमुळे पोलिसांच्या
कामात अधिक सुसूत्रता, शिस्तबध्दता व पारदर्शकता आली असून महाराष्ट्र हे डिजीटल पोलिसिंग
राज्य झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे
केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या सुसज्ज तीन मजली इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ
बागडे तसेच गृहराज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत
कराड, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत
खैरे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, सुभाष झांबड, सय्यद इम्तीयाज जलील, अतुल सावे, प्रशांत
बंब, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस
महासंचालक गृहनिर्माण बिपिन बिहारी, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी
उदय चौधरी, महानगर पालिका आयुक्त डॉ.निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदी
मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेत गतिमानता येण्यासाठी
संपूर्ण राज्यात पोलीस आयुक्तालये, पोलीस अधिक्षक कार्यालये, पोलीस ठाणे डिजीटायझेशन
यंत्रणेच्या माध्यमातून आप-आपसात जोडली गेली आहे. यामुळे नागरिकांना सोशल मिडियाच्या
माध्यमातून तक्रारी नोंदविणे शक्य झाले आहे. ऑनलाईन कामकाज सुरू झाल्यामुळे गुन्हेगारी
प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. दीड वर्षाच्या कालावधीत आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज
अशा या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीतील सोयीसुविधा पोलिसांना लोकाभिमुख
करण्यासाठी उपयुक्त आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी
नागपूर शहरात कमाडिंग नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून नाशिक आणि औरंगाबाद शहरात
असा कक्ष लवकरच तयार करण्यात येईल, यामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यास
पोलीस प्रशासनास मदत होणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी
शासनाने पोलीस वेलफेअरच्या माध्यमातून विविध योजना, आरोग्य सुविधा आखल्या आहेत. पोलीसांना
उत्तम दर्जाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन दिला असून
या माध्यमातून पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे श्री.
फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणाले
की, पोलीस आयुक्तालयाची नूतन इमारत ही ग्रीन बिल्डिंग असून नैसर्गिक हवा, पुरेशी प्रकाश
व्यवस्था, सौरऊर्जा निर्मिती, अशी नियोजनबध्द व्यवस्था इमारतीत करण्यात आली आली असून
यामुळे पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. पोलिसांना चांगले काम
करता यावे यासाठी आधुनिक सर्व दर्जेदार सोयीसुविधा इमारतीत उपलब्ध करुन देण्यात आल्या
आहेत. याप्रसंगी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनीही आपले मनोगत व्यक्त
केले.
इमारतीचे वैशिष्ट्य
22 कोटी 27 लाख रुपये या इमारतीच्या बांधकामासाठी खर्च
झाला आहे. तीन मजली नव्या इमारतीत पोलीस अधिकाऱ्यांच्या कक्षांसह नियंत्रण कक्ष, सायबर
क्राईम सेल, तसेच गुन्हे शाखेची स्वतंत्र लॉकअप रुम, सोशल मीडिया कक्ष, आणि मिटिंग
हॉल, कॉन्फरन्स हॉल आहेत. भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय
आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रयत्नाने पोलीस आयुक्तालयाच्या
इमारतीसाठी शासनाने निधी मंजूर केला आणि फेब्रुवारी 2017 मध्ये इमारत बांधकामाचे औपचारिक
उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. दीड वर्षाची मुदत या
इमारतीसाठी देण्यात आली होती. 10 मे 2018 रोजी इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले
आहे. सुमारे 21 एकर परिसरात नवीन इमारत बांधण्यात आली असून भविष्यातील उपयुक्तता आणि
गरजा लक्षात घेऊन मराठवाड्यातील नागरिकांसाठी कार्यक्षम अशी पोलीस आयुक्तालय इमारतीची
निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या प्राथमिक गरजा, पुरेशी जागा, पार्कींगची व्यवस्था यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी
व्हावा यासाठी आधुनिक सोयी-सुविधांनी ही इमारत सज्ज असून इंटरनेट सुविधा, आधुनिक यंत्रसामुग्री,
तंत्रज्ञान साहित्य, आपत्कालीन मार्ग, लिफ्ट आदींनी ही इमारत परिपूर्ण करण्यात आली
आहे.
अधिकारी कर्मचारी यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी पुरक
वातावरण इमारत कार्यक्षेत्रात निर्माण करण्यात आले आहे. प्रत्येक शाखा, कार्यालयांना
प्रशस्त जागा देण्यात आली असून एकाच छताखाली सर्व कार्यालय स्थापित केली आली आहे. इमारती
समोर विस्तर्ण लॉन, सुंदर असे प्रवेशद्वार, ही नवीन इमारतीचे खास वैशिष्टय आहे. विज
बचतीचे महत्व लक्षात घेऊन इमारतीवर प्रतिवर्षी 73 हजार युनिट वीज निर्मिती करण्याची
क्षमता असलेला सौरऊर्जा पॅनल बसविण्यात आला आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात एलईडी दिवे
लावण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment